आरमोरी :
आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरमोरी शहरातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत आहे. काही राजकीय पक्षांकडून “बापू, इथे सही कर” एवढ्याच अधिकाराचे वाड्यातील उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. परंतु, जनता अशा उमेदवारांना खरंच स्वीकारेल का, हा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, काही पक्ष उच्चशिक्षित, प्रगल्भ आणि समाजकार्यात सक्रिय असलेल्या व्यक्तींना डावलून, केवळ आपल्या मर्जीप्रमाणे काम करणाऱ्या लोकांना तिकीट देत आहेत. “जिथे सही करायची, तिथे कर” एवढंच सांगून चालणाऱ्या अशा उमेदवारांकडून शहराचा विकास अपेक्षित आहे का, असा प्रश्न आता जनतेतून विचारला जात आहे.
आरमोरीतील मतदार आता जागरूक झाले आहेत. त्यांना केवळ पक्ष नव्हे, तर उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व, प्रामाणिकपणा आणि दृष्टीकोन महत्त्वाचा वाटतो. जनतेचा कल गुणवत्ताधारक आणि विकासाभिमुख उमेदवारांकडे झुकत असून, “आम्हाला ‘सही करणारे’ नाही, तर काम करणारे हवे,” असा सूर उमटू लागला आहे.
आगामी निवडणुकीत आरमोरीकर कोणाला निवडतात — “बापू इथे सही कर” प्रकारचे उमेदवार की खऱ्या अर्थाने सक्षम नेते — हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल.




