गडचिरोली, दि. १० जून २०२६ : अहेरी नगरपंचायतीचे कर अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर बुधवारी सकाळी झालेल्या कथित जीवघेण्या हल्ल्यानंतर संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यातील नऊ नगरपंचायती आणि तीन नगरपरिषदांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले असून, आरोपींवर कठोर व तातडीची कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, या प्रकरणी काँग्रेसचे नेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे. मात्र, कर्मचाऱ्यांच्या मते केवळ गुन्हा दाखल करून चालणार नाही, तर आरोपींना तातडीने अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
मॉर्निंग वॉकदरम्यान हल्ला…
मिळालेल्या माहितीनुसार, अहेरी नगरपंचायतीचे कर अधिकारी वैभव पांढरे हे बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. सकाळी सुमारे ७.१५ वाजण्याच्या सुमारास अहेरी-वेंकटरावपेठा मार्गावरील अबनपल्ली फाटा परिसरात त्यांना अडवून मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.
या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. तसेच हात-पायालाही मार लागल्याची माहिती आहे. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत त्यांना अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेऊन पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
चार जणांविरुद्ध गुन्हा…
या प्रकरणी वैभव पांढरे यांच्या तक्रारीवरून अजय कंकडालवार, अजय नैताम, पिंटू मडावी आणि आणखी एका व्यक्तीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहेरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय कंकडालवार यांना गडचिरोली पोलिसांनी ताब्यात घेतले असून अहेरी पोलिसांचे पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले आहे. इतर आरोपींच्या शोधासाठीही विशेष पथके कार्यरत असून लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
कर्मचाऱ्यांचा जिल्हाभर कामबंद आंदोलनाचा निर्णय…
या घटनेचा निषेध करत गडचिरोली जिल्ह्यातील नऊ नगरपंचायती आणि तीन नगरपरिषदांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकमुखाने कामबंद आंदोलन सुरू केले आहे. सरकारी कर्तव्य बजावत असलेल्या एका नगरपंचायत अधिकाऱ्यावर झालेला हा हल्ला संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा असल्याचे कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे.
कर्मचारी संघटनांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, आरोपींवर प्रभावी आणि कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. तसेच अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कामकाजावर परिणाम…
कामबंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील अनेक नगरपालिका आणि नगरपंचायतींचे दैनंदिन प्रशासकीय कामकाज प्रभावित झाले आहे. नागरिकांना विविध प्रमाणपत्रे, करसंबंधित सेवा, बांधकाम परवानग्या, स्वच्छता व्यवस्थापनाशी संबंधित प्रशासकीय कामे आणि इतर नागरी सेवा मिळण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोलिसांवर वाढले दबावाचे सावट…
कर्मचारी संघटनांच्या आंदोलनामुळे आणि संपूर्ण जिल्हाभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामकाज ठप्प झाल्याने या प्रकरणात पोलिस प्रशासनावर कारवाईचा दबाव वाढल्याचे बोलले जात आहे. जिल्हाभरातील नगरपालिका व नगरपंचायतींमधील कर्मचारी एकवटल्यामुळे आरोपींविरुद्ध तातडीने आणि कठोर कारवाई होईल, अशी अपेक्षा कर्मचारी संघटनांनी व्यक्त केली आहे.
जुन्या वादाची चर्चा…
दरम्यान, या हल्ल्यामागे जुन्या वादाची पार्श्वभूमी असल्याची चर्चा अहेरी परिसरात रंगत आहे. काही महिन्यांपूर्वी अजय कंकडालवार यांच्या कथित अवैध बहुमजली इमारतीवर प्रशासनाने कारवाई केल्यानंतर संबंधित वाद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या संदर्भात कोणतीही अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसून पोलिसांकडून सर्व अंगांनी तपास सुरू आहे.
सध्या संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागले असून आरोपींवर होणारी कारवाई आणि कर्मचारी आंदोलनाची पुढील दिशा याकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.




