गडचिरोली : राष्ट्रीय महामार्ग क्र. ९३० हा गडचिरोली जिल्ह्यासाठी तसेच छत्तीसगड राज्याशी जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण, दुरुस्ती व पायाभूत सुविधा उभारणीची मोठ्या प्रमाणावर कामे सध्या सुरू आहेत. गडचिरोली ते ढवळी या दरम्यानच्या भागात सुरू असलेल्या कामांमुळे मोठ्या प्रमाणावर मातीची पडझड, दगडांचे घसरणे तसेच काम करणाऱ्या यंत्रसामग्रीमुळे वाहतुकीवर गंभीर अडथळे निर्माण होत आहेत.
या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा अपघात होऊ नयेत, तसेच कामकाज सुरळीत व्हावे, यासाठी गडचिरोली-धानोरा-मुरूमगाव ते छत्तीसगड/महाराष्ट्र राज्य सीमापर्यंतचा रस्ता ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या काळात नागरिकांनी पर्यायी मार्ग आरमोरी वडसा अर्जुनी (मोरगांव) कोहमारा राजनांदगाव चा वापर करून प्रवास करावा, अशी सूचना राष्ट्रीय महामार्ग विभागाने केली आहे. तसेच, या निर्णयाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस प्रशासन, वनविभाग व संबंधित विभागांना देण्यात आली आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभागाने स्पष्ट केले आहे की, रस्त्यावरील सुरू असलेली कामे पूर्ण होईपर्यंत वाहतुकीला परवानगी देणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, संयम बाळगावा आणि पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.