गडचिरोली : अहेरी शहरालगत असलेल्या नागेपल्ली गावात स्मशानभूमीच्या जागेवरून मोठा वाद उद्भवला असून, दोन गटांत तुंबळ मारामारी झाली. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागेपल्ली येथील स्मशानभूमीच्या जागेवर काही बाहेरगावाहून आलेल्या व्यावसायिकांनी बेकायदेशीर वराहपालन सुरू केले होते. शनिवारी एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी गावकरी स्मशानभूमीत गेले असता, अतिक्रमण करणाऱ्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावरून दोन्ही गटांत वाद निर्माण झाला आणि त्याचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले.
हातात लाठ्या-काठ्या घेऊन दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला चढवला. या मारामारीत अनेक गावकरी जखमी झाल्याची माहिती आहे.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही जागा अनेक वर्षांपासून स्मशानभूमी म्हणून वापरली जाते. यापूर्वी दोनदा येथील अतिक्रमण हटविण्यात आले होते. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फायदा घेत पुन्हा अतिक्रमण करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच अहेरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही गटांना समजावून परिस्थिती नियंत्रणात आणली.