गडचिरोली : आदिवासी संस्कृती, परंपरा आणि लोककलेचा भव्य आविष्कार साकारत गडचिरोली शहरात पहिल्यांदाच गडचिरोली ट्रायबल महोत्सव तसेच राष्ट्रीय पातळीवरील ट्रायबल कल्चरल स्पर्धा ‘कोया किंग अँड क्वीन’ चे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक महोत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी तथा सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याने संपूर्ण जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे.
हा भव्य सांस्कृतिक महोत्सव दि. २८ व २९ जानेवारी २०२६ रोजी महाराजा मंगल कार्यालय, धानोरा रोड, गडचिरोली येथे पार पडणार असून, हिरा सुखा बहुउद्देशीय आदिवासी संस्था व राष्ट्रीय मानवाधिकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे या दोन्ही संघटनांतर्फे सलग तिसऱ्या वर्षी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या महोत्सवात महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमधून आलेले आदिवासी कलाकार, स्पर्धक आणि समाजबांधव सहभागी होणार असून, आदिवासी जीवनशैली, लोकनृत्य, पारंपरिक गीत, वेशभूषा, सांस्कृतिक साहित्य व रितीरिवाज यांचे भव्य दर्शन नागरिकांना अनुभवता येणार आहे. देशभरातील आदिवासी समाजातील सांस्कृतिक वैविध्याची ओळख निर्माण करणे, हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.
दि. २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता कार्यक्रमास प्रारंभ होईल. सकाळी ११ वाजता अमृता फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यानंतर एकल आदिवासी गीत गायन स्पर्धा, ग्रूमिंग स्पर्धा तसेच समूह आदिवासी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.
दि. २९ जानेवारी २०२६ रोजी देशभरातून आलेल्या स्पर्धकांचे आगमन होणार असून, मान्यवर प्रमुख व विशेष अतिथींच्या उपस्थितीत दुपारी २ वाजता स्पर्धांना सुरुवात होईल. सायंकाळी ७ वाजता पारितोषिक वितरण समारंभ, तर रात्री १० वाजता महोत्सवाचा भव्य समारोप होणार आहे.
पारितोषिकांची आकर्षक रचना…
२८ जानेवारी २०२६
एकल गीत गायन स्पर्धा
प्रथम पारितोषिक ₹१०७५०, द्वितीय पारितोषिक ₹७७५०
समूह आदिवासी नृत्य स्पर्धा
प्रथम पारितोषिक ₹३०७५० | द्वितीय पारितोषिक ₹२५७५०
२९ जानेवारी २०२६
आदिवासी सांस्कृतिक साहित्य व वेशभूषा स्पर्धा
प्रथम पारितोषिक ₹१०७५० | द्वितीय पारितोषिक ₹७७५०
गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच आदिवासी संस्कृतीचा जनसागर शहरात उसळणार असून, या राष्ट्रीय स्तरावरील महोत्सवामुळे गडचिरोलीची ओळख देशपातळीवर अधिक ठळक होणार आहे. या ऐतिहासिक सांस्कृतिक पर्वात जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.




