मी वाईट आहे…. चुकीचं वागतो असं कधीच कुणी म्हणत नाही!

0
210

संपादकीय अग्रलेख …श्रीनिवास गेडाम यांच्या लेखणीतून…

आपण जन्माला येतो तेव्हापासून ते थेट मरेपर्यंत कितीतरी माणसं या ना त्या कारणाने आपल्या जीवनात येतात. यातील काहींशी आपलं जुळतं….पटतं… मैत्री होते! काहींशी पटत नाही… मतभेद होतात. काही तर पक्के वैरी होतात! अगदी मरेपर्यंत राहुकेतूसारखे छळतात! मरतो तेव्हाच वैरत्व संपतं! तोपर्यंत नाही!

वैरत्व होण्याला कारण असतंच असं नाही. गैरसमजतीतून किंवा अन्य कारणामुळे सुद्धा वैर होऊ शकतं. एखाद्याला पैसे उसणे दिले नाही म्हणून वैरी होऊ शकतो. लग्नाला बोलवून सुद्धा आला नाही या क्षुल्लकशा कारणावरून अबोला धरल्याची अनेक उदाहरणे आहेत! घरमालक किराया वाढवून मागतो आहे तुम्हाला मंजूर नाही वाद संघर्ष होणं निश्चित आहे. तुम्ही ज्या कुठल्या क्षेत्रात काम करीत असाल तिथे तुमचे शत्रू निर्माण होतात. एकूण काय तर जिथे जिथे संपर्क येतो तिथे तिथे मैत्री किंवा शत्रुत्व यापैकी काहीतरी होतंच!

पतिपत्नी…. मुलं…. आप्त किंवा अन्य कुठलीही नाती असू द्या कधीतरी संघर्ष होतोच! आपल्या हितसंबंधाला
जिथे कुठे बाधा पोहचते तिथे संघर्ष होणं अगदी क्रमप्राप्त आहे. कुठलीही व्यक्ती स्वतःवर जास्त प्रेम करते. व्यक्ती स्वतः कितीही वाईट असलीतरी स्वतःचा पक्ष आधी घेते. मी वाईट आहे…. चुकीचं वागतो असं कधीच कुणी म्हणत नाही! मी किरायेदार असेन किंवा घरमालक असेन तरी आपापली बाजू घेतो! दुसरा कितीही बरोबर असला तरी मान्य करीत नाही! पत्नी किंवा पती यापैकी कुणीतरी दुष्ट असल्यास वाद खूप विकोपाला जाण्याची शक्यता असते. दोघंही समजदार असतील तर एकदुसऱ्याला समजून घेतात. कुणीतरी नमतं घेऊन सॉरी म्हणतं! वाद चिघळत नाही.

सोशल मीडियावर वावरतांना काहींशी पटतं…. काहींशी पटत नाही. कुणाशी घट्ट मैत्री होते तर कुणी अजिबात
आवडत नाही. कुणाला ओळखण्यात चूक होते तर कुणाला समजण्यात चूक होते. कधी कधी आपलं पण चुकत असतं पण आपण चूक मान्य करीत नाहीत! काही काही माणसं खूप मुजोर असतात. सारा दोष समोरच्या व्यक्तीवर ढकलून मोकळे होतात. काहीजण यासाठी चूक कबूल करीत नाही की, चूक कबूल केलीतर समोरची व्यक्ती त्याचा नेहमीसाठी गैरफायदा घेईल!

एक आहे या जगात वाईट माणसं खूप भेटतात. सज्जन नि समजदार एखादाच व्यक्ती असते! अधिकांश सर्वसामान्य व्यक्तींचं वागणं एकसारखं असतं! सामान्य व्यक्तीत सुद्धा काही असामान्य व्यक्ती असतात पण त्यांचं
प्रमाण अत्यल्प आहे! वैर व्हायला वेळ लागत नाही पण
मैत्री होणं खूप कठीण आहे. मैत्री शेवटपर्यंत टिकवणं त्याहून कठीण काम आहे. चांगली माणसं फुलांसारखी असतात. जे स्वतः सुंदर असतात नि इतरांनाही सुंदर करतात! आनंद देतात! दुष्ट माणसं चिखलासारखी असतात जी स्वतः घाणेरडी असून इतरांना घाणेरडी करतात. शेवटी कुणाला कशी माणसं भेटतील सांगता येत नाही. सर्व योगायोग नि नशिबाचा भाग आहे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here