श्री निवास गेडाम यांच्या लेखणीतून..
दिनांक.14/2/2023
तारुण्यात आल्यावर प्रेमात पडणं स्वाभाविक आहे. निसर्गत:च स्त्री आणि पुरुषात एकमेकांबद्दल आकर्षण आहे. हे आकर्षण म्हणजेच प्रेम आहे! दुसरं काही नाही! कॉलेज जीवनात अनेकांना प्रेमाची बाधा होते. या काळात फारशी समज नसते. शारीरिक आकर्षण वाटल्याने मुलं मुली प्रेमात पडतात. समजून उमजून केलं जातं ते प्रेम कसलं? तो तर व्यवहार झाला! पोरगं दिसायला हिरोवाणी आहे…. श्रीमंत आईवडिलांचं एकुलतं एक पोरगं आहे….गाडी घोडा बंगला सगळं काही आहे त्याच्याकडे अशा मुलावर शेकडो मुली जीव ओवाळतील! हुशार पण गरीब असलेल्या मुलाकडे एखादीच मुलगी आकर्षित होईल! शेवटी प्रत्येकजण आपापलं हित बघतो. दुसऱ्याचा आधारवड होण्यासाठी कुणीच लग्न किंवा प्रेम करीत नाही. सत्यवान थोडयाच दिवसात मरणार आहे हे माहीत असुनही सती सावित्रीने त्यालाच पती म्हणून निवडलं हे आताच्या युगात कदापी होणं शक्य नाही! मुलगा वेल क्वालिफाईड नि भरपूर पगार असणारा असला तरच त्याला मुलगी दिली जाते.! पत्नी पतीवर तोवर प्रेम करते जोवर तो चांगला सुदृढ असतो नि पैसे कमवून आणतो. उद्या भर तारुण्यात त्याने खाट पकडली किंवा विकलांग झाला तर पत्नी त्याच्याजवळ नांदण्याची शक्यता फार कमी आहे. आमच्या आईवडिलांच्या काळात नवऱ्याला देव समजलं जायचं. त्याचं सगळं सुखदुःख पत्नी वाटून घ्यायची. आज तो काळ राहिला नाही. मुलं…. बायको सगळे सुखाचे सोबती आहेत. फक्त आईवडील तेवढे मुलांवर निर्व्याज प्रेम करतात बाकी कुणी नाही!
वधूपिता उगीच कुणाला कन्यादान करीत नाही. तो नोकरी…. श्रीमंती…. जमीनजुमला बघूनच मुलगी देतो. आज खेड्यातील शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी द्यायला कुणी तयार नाही. ज्याला त्याला नोकरीवाला जावई हवा आहे. मुलगी आरामात सुखात लोळली पाहिजे हाच एक विचार लग्न करतांना असतो. काळ बदलला आहे. सगळी नाती व्यवहारिक झाली आहेत! नको त्या गोष्टीला अवास्तव महत्व आलं आहे. पूर्वी स्त्री म्हटलं की, जितीजागती सौजन्यमुर्ती डोळयांपुढे उभी राहायची. आज तिने महाकालिकेचं रुप धारण केलं आहे. कालाय तस्मे नमः दुसरं काय म्हणणार…..???