गडचिरोली, दि. १३ जून : गडचिरोली ते धानोरा या महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामातील दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, रस्ता पूर्ण होण्यापूर्वीच ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या भेगांमुळे बांधकामाच्या गुणवत्तेवर संशय व्यक्त केला जात आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते विजय शृंगारपवार यांनी या प्रकरणात ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.
शृंगारपवार यांनी सांगितले की, गडचिरोली–धानोरा महामार्गाचे काम मागील सहा ते आठ महिन्यांपासून सुरू असून अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही. मात्र, काम पूर्ण होण्यापूर्वीच रस्त्याच्या मध्यभागी मोठ्या प्रमाणात भेगा पडू लागल्याने वापरण्यात आलेल्या साहित्याच्या गुणवत्तेबाबत आणि तांत्रिक निकषांच्या अंमलबजावणीबाबत गंभीर शंका निर्माण झाल्या आहेत.
त्यांनी आरोप केला की, हा केवळ तांत्रिक दोष नसून संपूर्ण निविदा प्रक्रियेत आणि अंमलबजावणीत झालेल्या त्रुटींचा परिणाम असू शकतो. प्राप्त माहितीनुसार, या महामार्गाच्या बांधकामासाठी सुरुवातीला सुमारे २५० कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली होती. या कामासाठी अनेक कंपन्यांनी स्पर्धात्मक निविदा भरल्या होत्या. तीव्र स्पर्धेमुळे दक्षिण भारतातील एका कंपनीने सुमारे २०० कोटी रुपयांमध्ये हे काम मिळवले, म्हणजेच मूळ अंदाजित किंमतीपेक्षा तब्बल ५० कोटी रुपये कमी दराने हा ठेका स्वीकारण्यात आला.
श्रृंगारपवार यांच्या म्हणण्यानुसार, इतक्या कमी दरात काम स्वीकारल्यानंतर संबंधित कंपनीला प्रत्यक्ष काम करणे आर्थिकदृष्ट्या अवघड ठरत असल्याने त्यांनी हे काम पुढे गडचिरोली जिल्ह्यातील एका मोठ्या बांधकाम कंपनीला तसेच निविदेतील प्रतिस्पर्धी असलेल्या दुसऱ्या कंपनीला सुमारे १९९ कोटी रुपयांत पेटी कॉन्ट्रॅक्ट (सब-कॉन्ट्रॅक्ट) पद्धतीने दिल्याची माहिती समोर आली आहे.
यामुळे निविदा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, केवळ काम मिळवण्यासाठी कमी दराच्या निविदा भरायच्या आणि नंतर खर्च वाचवण्यासाठी कामाच्या गुणवत्तेशी तडजोड करायची, अशी पद्धत काही ठेकेदारांकडून अवलंबली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. याच कारणामुळे रस्त्याच्या दर्जावर परिणाम होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
विजय शृंगारपवार यांनी पुढे सांगितले की, गडचिरोली जिल्हा हा मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचा पालकत्व असलेला जिल्हा आहे. याशिवाय जिल्ह्याला सहपालकमंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव पालक सचिव म्हणून लाभलेले आहेत. अशा परिस्थितीतही जिल्ह्यातील कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांमध्ये जर निकृष्ट दर्जाचे काम होत असेल, तर ते शासनाच्या विकास दाव्यांवर आणि देखरेख यंत्रणेवर प्रश्न उपस्थित करणारे आहे.
हा महामार्ग गडचिरोली, धानोरा आणि पुढे छत्तीसगडला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून या रस्त्यावरून दररोज खनिज वाहतूक करणारी हजारो जड वाहने प्रवास करतात. त्यामुळे रस्त्याची गुणवत्ता राखली गेली नाही तर भविष्यात गंभीर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा अत्यंत संवेदनशील विषय असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, महामार्गावर पडलेल्या भेगांचे छायाचित्रे आणि व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर व्हायरल होत असून अनेक नागरिकांनीही या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. कोट्यवधी रुपयांचा सार्वजनिक निधी खर्च करूनही जर रस्ता पूर्ण होण्यापूर्वीच खराब होत असेल, तर त्यामागील कारणांची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
विजय शृंगारपवार यांनी या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र तांत्रिक समितीमार्फत चौकशी करून दोषी ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचा विचार करावा तसेच कामातील त्रुटींकडे दुर्लक्ष करणाऱ्या किंवा संबंधितांना पाठीशी घालणाऱ्या महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
सध्या या आरोपांमुळे गडचिरोली–धानोरा महामार्ग प्रकल्प पुन्हा चर्चेत आला असून प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते आणि प्रत्यक्ष गुणवत्ता तपासणी केली जाते का, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.




