संपादकीय अग्रलेख…
देश आणि समाजासाठी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवणारी माणसं आता राहिली नाहीत! ती खरोखरच असती तर परत एक नवीन क्रांती जन्माला आली असती! लोक सुखवस्तू झाले आहेत! बिळात राहून काव काव करतात. मोर्चे…. धरणे…. भाषणबाजी आणि निवेदन दिलं की संपलं! जीवावर उदार होऊन सर्वस्वाचे बलिदान करण्याचे दिवस आता इतिहासजमा झाले आहेत.
देशासाठी मरण्याचा जिगर फक्त सीमेवर लढणाऱ्या सैनिकांकडे उरला आहे…..गाव शिवारात राहून दहाडणाऱ्या सैनिकांकडे अजिबात नाही! गावशिवारात राहणारे सैनिक कायदेकानून पायदडी तुडवून दहशत… अराजकता पसरवतात दुसरं काही नाही. महागाई….. . बेकारी……..दडपशाही…. खाजगीकरण…..सत्तेचा दुरुपयोग…. घटनेची पायमल्ली या विषयी कधी बोलत नाही. त्यांना फक्त धर्म दिसतो! हिंदुत्व दिसतं! … मांग…. ढोर… चांभार … गोंड…. परधान यांच्यावर जातीय अत्याचार होतो तेव्हा कुणी बोलत नाही. निवडणूक आली की त्यांना सगळे हिंदू असल्याचा साक्षात्कार होतो एरवी काही ठराविक जातींचेच समाजात नेहमी वर्चस्व दिसून येतं. श्रीलंकेत लोक पेटून उठले…. आपल्याकडे असं होत नाही कारण लोक अठरापगड जातीत विखुरले गेले आहेत. कधी नव्हे एवढी भयानक परिस्थिती देश अनुभवत आहे…. पण सगळे मुकदर्शक बनून बघत आहेत!