Gadchiroli.date..3/10/2022
सध्या गडचिरोली जिल्ह्यात दोन समस्यांनी लोक खूप त्रस्त झाले आहेत. एक नरभक्षी वाघाची समस्या आणि दुसरी वाहतुकीच्या रस्त्यांची झालेली अतिशय वाईट परिस्थिती ! दोन्हीमध्ये आजपर्यँत अनेकांचे जीव गेले आहेत आणि जात आहेत! लोक फारसे जागरूक नाही. लोकप्रतिनिधी…. अधिकारी आणि शासनाने झोपेचं सोंग घेतल्याने जनतेचा आवाज ” अरण्यरुदन ” ठरत आहे. अधिकारी त्यांच्या खास स्टाईलने निवेदन घेऊन निव्वळ कोरी आश्वसने देतात निवेदन देणाऱ्यांना समाजसेवा केल्याचं समाधान मिळतं. फोटो छापून येतात पेपरात! जनतेचे प्रश्न आहेत तिथेच राहतात!
अगदी कालपरवा भामरागडचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय भेषज अधिकारी (डॉक्टर ) विजय मडावी ड्युटी बजा वून घरी जात असतांना मलम पोडूर रस्त्यावर खराब रस्त्यामुळे गाडीला अपघात झाला. रस्ता निर्मनुष्य असल्यामुळे वेळेवर त्यांना कुठलीच मदत मिळू शकली नाही. भामरागड ला भरती करण्यासाठी नेलं तेव्हा खूप उशीर झाला होता. अवघ्या 42 व्या वर्षी त्यांना जिवाला मुकावं लागलं! जिल्ह्याच्या दक्षिण भागाला आंध्र प्रदेश लागून असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक चालते. सतत वाहने येत जात असतात. पावसाळ्यात रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडतात. माती वाहून जाते. पूल वाहून जातात. लोक जीव मुठीत घेऊन गाडी चालवतात आणि मरतात! सरकार वाहतुकीचे अजून अजून कडक नियम बनवते. जबर जुर्माना आकारते. लोकांना वाहतुकीचे नियम पाळा म्हणून कडक भाषेत सांगते आणि इकडे खराब रस्त्यांमुळे लोकांचा नाहक बळी जात आहे! सरकारला लोकांना दंड करण्याचा…. परवाना दाखव म्हणण्याचा खरंच नैतिक अधिकार आहे का हे विचारलं पाहिजे!
बहुतेक अपघात या खराब रोडमुळेच होतात. वाहनांची
भरमसाठ होणारी गर्दी…. अरुंद रोड…. रस्त्यातील धोकादायक मोठमोठे खड्डे अपघाताला कारणीभूत आहेत. नितीन गडकरी म्हणतात आम्ही उत्कृष्ठ रस्ते तयार करून देशाचा पूर्ण नक्षाच बदलून टाकला आहे! चित्र आपल्यासामोर आहे. तुम्हीच काय ते ठरवा.