आरमोरी तहसीलातील इंजेवारी गावाजवळील पेवटी-वट्टी-बोडी परिसरात आज पुन्हा एकदा भीषण वन्यजीव हल्ल्याने जीव गेला. गावातील कुंदा खुशाल मेश्राम या शेतातील काम करत असताना वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे व शोककळेचे वातावरण निर्माण झाले आहे.
आज सकाळी 11 वाजता कुंदा मेश्राम शेतात गेल्या होत्या. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत परत न आल्याने त्यांचा नातू किसन शेतात गेला, मात्र त्या दिसून न आल्याने तो घरी येऊन आई व गावातील काही लोकांना घेऊन पुनश्च शोधासाठी गेला. शेताजवळील शेणापासून काही अंतरावर त्यांना मृतदेह आढळून आला. मृतदेहावरील जखमांवरून हा वाघाचा हल्ला असल्याचे स्पष्ट झाले.
कुंदा खुशाल मेश्राम यांच्या पश्चात एक मुलगा व तीन मुली आहेत. पतीचे निधन पूर्वीच झाले असून कुटुंब आर्थिक कठीण परिस्थितीत आहे.
दरम्यान, माकप (महाराष्ट्र कामगार पक्ष) आणि शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) यांनी आधीच या भागात वाघ व इतर हिंस्र वन्यप्राण्यांची वाढती हालचाल याबाबत वनविभागाला निवेदन देऊन इशारा दिला होता. मात्र वनविभागाने योग्य लक्ष न दिल्यानेच आज ही दुर्दैवी घटना घडल्याचा गंभीर आरोप माकप व शेकापने केला आहे. ग्रामीणांना सुरक्षिततेसाठी त्वरित उपाययोजना न केल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
स्थानिकांनी वनविभागाकडे मागणी केली आहे की,वाघाला तात्काळ सुरक्षितरीत्या पकडून स्थलांतरित करण्यात यावे
ग्रामीण भागात गस्त वाढवावी,शेतात काम करणाऱ्या नागरिकांसाठी सुरक्षा उपाययोजना तातडीने राबवाव्यात,पीडित कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी
वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.




