१६ डिसेंबर २०२५ रोजी नागपूरला भव्य लाँग मार्च मेळावा…
गडचिरोली :
शेतकरी संघटनेचे नेते व माजी आमदार अँड. वामनराव चटप यांनी आज गडचिरोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारच्या आर्थिक धोरणांवर तीव्र टीका करत राज्य “दिवाळखोरीत” गेल्याचा आरोप केला. महसुली उत्पन्नातील घट, वाढलेला खर्च, बजेटमधील तूट, कर्जाचा प्रचंड डोंगर आणि व्याजाचा असह्य भार या सर्व गोष्टी सरकारच्या आर्थिक व्यवस्थेतील अपयशाचे प्रतीक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अँड. चटप यांनी सांगितले की राज्यावरचे कर्ज विक्रमी पातळीवर पोहोचले असून व्याजाचा बोझा प्रशासनाला पंगू करत आहे.अर्थसंकल्पानंतरही नवीन कर्ज घेण्याची वेळ येणे म्हणजे सरकारच्या आर्थिक शिस्तीचा पूर्ण कोलमडलेला चेहरा आहे.केंद्र सरकारकडून कर्ज परवानगी मागणे ही राज्याच्या आर्थिक दिवाळखोरीची कबुलीच आहे.
याचबरोबर कोरडवाहू शेती, उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव, वाढत्या शेतकरी आत्महत्या, तसेच ‘समृद्धी महामार्ग’च्या धर्तीवर ‘शक्तीपीठ महामार्ग’ उभारणीसारख्या प्रलंबित प्रश्नांनाही त्यांनी जोरदारपणे वाचा फोडली.
विदर्भ राज्याचा निर्धार — “जीवाची पर्वा नाही!”
पत्रकार परिषदेत बोलताना अँड. चटप यांनी सर्वांत मोठी घोषणा केली. ते म्हणाले:
“डिसेंबर 2027 पूर्वी कुठल्याही परिस्थितीत आम्ही विदर्भ राज्य मिळवून घेणार!
युवा वर्गाच्या सहभागातून हे लढा आता निर्णायक टप्प्यावर नेणार आहोत.
हा आमचा जीवाचे रान करून लढायचा सवाल आहे—आता जीवाचीही पर्वा नाही!”
त्यांच्या या विधानाने सभागृहात एकच खळबळ उडाली. विदर्भ राज्याच्या मागणीला नव्या उर्जेने चालना मिळणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
१६ डिसेंबरला नागपूरमध्ये भव्य ‘लाँग मार्च मेळावा’….
राज्य सरकारच्या आर्थिक धोरणांच्या विरोधात आणि शेतकरी-विदर्भ प्रश्नांना न्याय मिळवण्यासाठी १६ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर येथे भव्य लाँग मार्च मेळावा आयोजित केल्याची घोषणा त्यांनी केली. हजारो तरुण, शेतकरी व नागरिक या लढ्यात सामील होतील, असा दावा त्यांनी केला.
या मेळाव्यामुळे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सरकारवर मोठा दबाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




