गडचिरोली, दि. १४ सप्टेंबर : गडचिरोली जिल्ह्यात पार पडलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत तब्बल ५३१ प्रकरणांचा निकाल लागला. यामध्ये ३२३ प्रलंबित खटले व २०८ दाखलपूर्व खटले आपसी तडजोडीतून निकाली निघाले. या माध्यमातून ₹१ कोटी ६६ लाख ३७ हजार ४५२ इतकी नुकसानभरपाई वसूल करण्यात आली. तसेच २६३ किरकोळ गुन्हा प्रकरणे गुन्हा कबुलीद्वारे निकाली काढण्यात आली.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार, मा. उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली, दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी गडचिरोली जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालयांमध्ये या वर्षातील तिसरी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
या लोकअदालतीत तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, धनादेश प्रकरणे (कलम १३८, एन.आय. अॅक्ट), कौटुंबिक वाद, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दिवाणी खटले, बँका व पतसंस्थांची थकीत कर्ज प्रकरणे, वीज वितरण कंपनीची थकीत विजबिल प्रकरणे, फायनान्स कंपन्यांची कर्ज प्रकरणे तसेच दाखलपूर्व वादांचा निपटारा करण्यात आला. यासाठी जिल्ह्यात एकूण ९ पॅनल कार्यरत ठेवण्यात आले होते.
जिल्हा न्यायालय, गडचिरोली येथील पॅनल क्र. २ वर एका वैवाहिक वाद प्रकरणात पती-पत्नी यांच्यात समझोता होऊन पत्नी पतीसह नांदायला गेली. या प्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. विनायक जोशी यांनी उभयतांचा सत्कार केला.
सदर लोकअदालतीत पॅनल क्र. १ वर तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एस. खोत, तर पॅनल क्र. २ वर दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) मा. एस. पी. सदाफळे यांनी कामकाज पाहिले. गुन्हा कबुलीद्वारे प्रकरणे निकाली काढण्यासाठी जिल्हा न्यायालय, गडचिरोली येथे विशेष न्यायालय ठेवण्यात आले होते, ज्यात मुख्य न्यायदंडाधिकारी एस. बी. विजयकर यांनी कामकाज केले.पॅनल सदस्य म्हणून सौ. सुरेखा बारसागडे (विधी स्वयंसेविका) व बालाजी बावने (विधी स्वयंसेवक) यांनी कार्य पाहिले.
लोकअदालतीचे यशस्वी आयोजन करण्यासाठी जिल्हा अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. किशोर आखाडे, जेष्ठ अधिवक्ता वृंद, समस्त अधिवक्ता, न्यायालयीन कर्मचारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले