Home ब्रेकिंग न्यूज  समाजकल्याण वस्तीगृहात विद्यार्थ्यांमध्ये मारामारी; लोखंडी रॉडने हल्ला, तिघे जखमी…

 समाजकल्याण वस्तीगृहात विद्यार्थ्यांमध्ये मारामारी; लोखंडी रॉडने हल्ला, तिघे जखमी…

0
218

 

गडचिरोली :

गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या नवेगाव परिसरातील समाजकल्याण विभागाच्या वस्तीगृहात सातवीच्या अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादातून मारामारीची गंभीर घटना घडली. या घटनेत लोखंडी पलंगाच्या रॉडने हल्ला करण्यात आल्याने तिघे विद्यार्थी जखमी झाले असून सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वस्तीगृहातील सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. दिवसभर सुरू असलेल्या चिडवाचिडवी आणि वादातून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याला चापट मारल्याने रागाच्या भरात संबंधित विद्यार्थ्याने सायंकाळी लोखंडी पलंगाची रॉड घेऊन त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

मध्ये पडलेल्या विद्यार्थ्यालाही दुखापत…

या दरम्यान भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या तिसऱ्या विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर लोखंडी रॉड लागून त्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्या चेहऱ्यावर जखम होऊन टाके घालावे लागले. तसेच हल्ला झालेल्या विद्यार्थ्याच्या हाताला दुखापत झाली असून चापट मारणाऱ्या विद्यार्थ्यालाही किरकोळ जखमा झाल्या आहेत.

तत्काळ उपचार; प्रकृती स्थिर

घटनेची माहिती मिळताच वस्तीगृह प्रशासनाने तात्काळ जखमी विद्यार्थ्यांना सामान्य रुग्णालयात नेऊन उपचार केले. सध्या सर्व जखमी विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

आयुक्तांची घटनास्थळी धाव….

या घटनेची माहिती मिळताच समाज कल्याण आयुक्त सचिन मडावी यांनी तात्काळ वस्तीगृहात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी जखमी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या उपचारांची खात्री केली.

पालकांना बोलावून समज देणे आवश्यक होते…

आयुक्त मडावी यांनी सांगितले की, संबंधित विद्यार्थ्यांचे पालकांना बोलावून त्यांना समज देण्यात येणार आहे. अल्पवयीन विद्यार्थी असल्यामुळे कठोर शिक्षा देणे शक्य नसले, तरी आवश्यक ती शिस्तभंगाची कारवाई आणि समुपदेशन करण्यात येईल.

शिस्तभंगाची शक्यता…

जर संबंधित विद्यार्थ्यांकडून पुन्हा अशा प्रकारची घटना घडली, तर त्यांना शाळेतून काढून टाकण्यासह पुढील कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

वस्तीगृहात सध्या २०० हून अधिक विद्यार्थी राहत असून व्यवस्थापनावर मोठा ताण असल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, सातवीच्या ४० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा जवळ आल्याने प्रशासनाने सध्या परिस्थिती संयमाने हाताळण्याचा निर्णय घेतला आहे.

लहान कारणातून मोठा वाद…

किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाने मारामारीचे रूप घेतल्याने ही घटना घडली. यामुळे अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या आक्रमकतेबाबत चिंता व्यक्त केली जात असून शाळा व वस्तीगृह स्तरावर समुपदेशन आणि जनजागृतीची गरज अधोरेखित होत आहे.

या घटनेमुळे वस्तीगृहाच्या सुरक्षाव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here