गडचिरोली, दि. १७ ऑक्टोबर :
मागील विधानसभेच्या निवडणुकीत महायुती अस्तित्वात असतानाही भारतीय जनता पक्षाने केलेल्या दगाबाजीमुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष रवी वासेकर यांनी आज कॉम्प्लेक्स येथील सर्किट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
वासेकर म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी धर्मराव बाबा आत्राम यांनी निवडणूक लढविण्याची पूर्ण तयारी केली होती; तरीही महायुतीत धर्म पाळत भाजपच्या उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारात बाबांनी स्वतःला झोकून दिले. बाबांची शस्त्रक्रिया झाली असतानाही त्यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी ६७ सभा घेतल्या होत्या.
विधानसभा निवडणुकीत अहेरी विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलं, मात्र भाजपचे माजी राज्यमंत्री अंबरीशराव आत्राम यांनी बंडखोरी करत धर्मराव बाबांच्या विरोधात निवडणूक लढवली. त्यानंतरही भाजपकडून त्यांच्यावर निलंबन किंवा पक्षातून कारवाई केली गेली नाही, ज्यामुळे भाजपने त्यांना निवडणुकीत पाठबळ दिल्याचे दिसते.
वासेकर यांनी स्पष्ट केले की, भाजपने विधानसभेच्या निवडणुकीत युती धर्म पाळला नाही, म्हणून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) स्वबळावर लढणार आहे.




