अस्पताल प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नागरिकांकडून तीव्र नाराजी…स्थानिक आमदार लक्ष घालणार काय…??
गडचिरोली। शहरातील सरकारी रुग्णालय परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाढत चाललेल्या प्रचंड गंदगीने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांत भितीचे वातावरण निर्माण केले आहे. रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते ड्रामा केअर सेंटरच्या भिंतींपर्यंत लागून असलेल्या नालीत ठिकठिकाणी साचलेला कचरा, दुर्गंधी आणि अस्वच्छता पाहून नागरिक संतापले आहेत. रुग्णालयाच्या परिसराबाहेरच जीवघेणी गंदगी दिसत असल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नाकावर रुमाल बांधून रुग्णालयात प्रवेश—दुर्गंधी असह्य…
रुग्णालयात येणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक नाकावर रुमाल किंवा मास्क बांधूनच रुग्णालयात प्रवेश करताना दिसत आहेत. परिसरातील असह्य दुर्गंधीमुळे रुग्णालयात काही वेळ उभे राहणेही कठीण झाले आहे. उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर या अस्वच्छतेचा सीधा परिणाम होत असून, “जीवघेण्या परिस्थितीत आम्हाला उपचार घ्यावे लागतात”, अशी नाराजी लोकांनी व्यक्त केली आहे.

मेडिकल कॉलेज सुरू… पण डॉक्टर बेपत्ता! मग काय मुन्नाभाई डॉक्टर पैदा करायचे आहे का…
मागील वर्षी मेडिकल कॉलेजची पहिली एमबीबीएस बॅच सुरू झाली. शंभर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जवळपास ३० डॉक्टरांची नियुक्ती दाखवली गेली. मात्र, आरोप असा की हे डॉक्टर मेडिकल कॉलेजमध्ये तास-दोन तास शिकवून थेट स्वतःच्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करायला जातात किंवा सरळ घरी जाऊन विश्रांती घेतात. त्यामुळे सरकारी रुग्णालयातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत आणि तक्रारी वाढत आहेत.
मुख्यमंत्री पालकमंत्री असतानाही महकमेची लाजीरवाणी निष्काळजी….
गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतानाही रुग्णालयातील ही भयावह अस्वच्छता प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे मोठे उदाहरण ठरत आहे. नागरिकांनी स्थानिक आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे.
आगामी निवडणुकांत नागरिकांचा रोष भडकू शकतो…
जिल्हा परिषद आणि नगरपरिषद निवडणुका तोंडावर असताना आरोग्य विभागाची ही ढिसाळ कामगिरी सत्ताधारी पक्षांसाठी डोकेदुखी ठरू शकते, अशी चर्चा शहरात सुरू आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची होत असलेली गैरसोय पाहता नागरिकांनी आगामी निवडणुकांत रोष व्यक्त करण्याचे संकेत दिले आहेत.
जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी…
गावकऱ्यांसह रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील अस्वच्छता वाढण्यात जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. “कुंभकरणाच्या झोपेत गेलेल्या” रुग्णालय प्रशासनाने तत्काळ जागे होऊन नागरिकांच्या जीवितास सर्वात महत्व देणे आवश्यक असल्याचे मत आरोग्यजागृत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
जीवघेणी अस्वच्छता आणि डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे रुग्णांच्या जीवाशी खेळल्या जात असल्याचे चित्र स्पष्ट होत असून, रुग्णालयातील ही गंभीर परिस्थिती तातडीने सुधारण्याची गरज आहे.




